!!! अन्न पूर्ण ब्रह्म !!!

!!! अन्न पूर्ण ब्रह्म !!!
जाणून घ्या अन्नाविषयी सर्व काही आणि ठरवा आपला आरोग्यदायी आहार

Saturday, 5 May, 2007

जल हेच जीवन !!

पाण्याला जीवन असे नाव आहे. ते एकदम सार्थ आहे. कारण सर्व सजीवांचे जीवनच पाण्यावरच अवलंबून आहे. मानवाची पाण्याची गरज मानव जातीच्या निर्मितीपासूनची आहे. मानवी शरीरालाच फक्त नव्हे तर मानवाच्या उत्क्रांतीसाठी , भरभरटीसाठी व प्रगतीसाठी पाणी आवश्यकच होते.



यामुळेच आदिमानव भटकंती सोडून जेव्हा एकेठीकाणी स्थिर झाला तेव्हा त्याने नदीकाठीच वस्ती केली. त्यातूनच सिंधू, नाईल, युफ्रेटीस इत्यादी संस्कृती उदयास आल्या. पुढे पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे व आहे ते पाणी योग्य रितीने न वापरल्यामुळेच या संस्कृती नष्टही झाल्या.


पाण्याला मराठीत "रस" असेही एक नाव आहे. तेही अगदी सार्थ आहे. कारण पाणी हेच मानवी शरीराचा ’जीवनरस’ आहे. मानवी शरीर ब-याच अंशी पाण्याचे बनलेले आहे. लहान बालकाच्या शरीराचा ७५ टक्के भाग पाण्याचा असतो. हे प्रमाण हळूहळू बदलत जाऊन प्रौढामध्ये त्याचे प्रमाण साधारणत: ६० ते ६५ टक्के होते.
मानवी शरीरामध्ये ६० -७५ टक्के पाणी असूनही जर शरीराभोवती जलरोधक त्वचा नसती तर या पाण्याचे बाष्पिभवन होऊन गेले असते. मग द्राक्षे सुकवून बनविलेल्या मनुका/ बेदाणे जसे दिसतात तसा माणूस दिसला असता.


सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सदासर्वकाळ योग्य व पुरेसे असावे लागते.
शरीरातील पाण्याच्या १० टक्कयाहून जास्त पाणी कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही.


मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे राहू शकते पण पाण्यावाचून सात दिवसापेक्षा जास्त तग धरू शकत नाही.


इतके पाणी शरीराला लागते तरी कशासाठी?
शरीरातील पाण्याचा दोन तृतीयांश भाग पेशींमध्ये असतो. उरलेला एकतृतीयांश भाग रक्त व इतर द्रवांच्या रुपाने वहात असतो.
तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला प्रत्येक स्नायुला त्याचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे.
तुम्ही दिवसातून कित्येक वेळेला पाणी पिता, त्याच प्रमाणे जेवता, रस पिता, थंडपेये पिता, तेव्हा तुमच्या शरीरात पाणी जाते. दिवसातून जितक्यावेळा तुम्ही लघवी करता तितक्या वेळा तुम्ही शरीरातून पाणी बाहेर टाकता. याव्यतिरिक्तही अनेक प्रकारे हे पाणी तुमच्या शरीरातून बाहेर पडत असते.
खूप थंड प्रदेशातील लोक जेव्हा श्वास सोडतात किंवा बोलतात तेव्हा त्यांच्या श्वासावाटे पाण्याची वाफ बाहेर जाताना तुम्ही पाहिलेच असेल. याचाच अर्थ तुमच्या उच्छवासातून पाणी शरीराबाहेर टाकले जाते.
तसेच खूप उष्णप्रदेशात किंवा कडक उन्हाळ्यात त्वचेच्या सूक्ष्मछिद्रांवाटे घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकले जाते. याच पाण्याचे बाष्पिभवन झाल्यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. अशाप्रकारे लघवी व्यतिरिक्त सर्वसाधारणपणे तुम्ही एक लिटर किंवा जास्त पाणी शरीराबाहेर टाकता.

त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण जर योग्य व पुरेसे ठेवायचे असेल तर सर्वप्रकारे शरीराबाहेर टाकलेल्या पाण्याइतकेच किंवा जास्त पाण्याचा पुरवठा तुमच्या शरीरास व्हायला हवा हे तुम्ही लक्षात ठेवा!

तुम्ही पाणी प्याला नाहीत तर तुमचे तोंड व जीभ कोरडी होईल. तुम्हास तहान लागेल व शरीरास थकवा जाणवेल. तुमच्या शरीरातील मीठाचे प्रमाण वाढेल यामुळे तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो.

ुम्ही खूप वेळ व्यायाम करीत असाल, भरपूर मैदानी खेळ खेळत असाल तर तुम्हाला खूप तहान लागते. ही तहानच तुमच्या शरीराची संदेश यंत्रणा आहे. तुमच्या शरीरास पाणी कमी पडत आहे व त्याचा पुरवठा त्वरीत व्हावयास हवा याचा संदेश ही यंत्रणा तुम्हास देत असते. तेव्हा तहान लागली की भरपूर पाणी प्या. दररोज दोन ते चार लिटर पाणी पिणे आरोग्यास आवश्यक आहे हे लक्षात ठेवा.

पाणी पिताना लक्षात ठेवा :

ाण्यामध्ये शरीरास अपायकारक सूक्ष्म असे रोगजंतू असू शकतात त्याकरीता पाणी पितानाही काही गोष्टी लक्षात ठेवा.
हे पाणी जर तुम्ही नळातून थेट घेत असाल तर पाणी घेण्याआधी थोडावेळ नळ तसाच चालू ठेवा म्हणजे पाईपमध्ये साठलेले पाणी निघून जाईल व तुम्हास ताजे पाणी मिळेल.
कोणतेही पाणी गाळून घ्या. बाजारात वेगवेगळी गाळणी यंत्रे उपलब्ध आहेत. काही गाळण्य़ा नळाला लावायचा असतात तर काही भांड्याना जोडलेल्या असतात . हल्ली आधूनिक गाळणी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. त्यात वापरलेल्या अतीनील किरणांमुळे पाण्यातील रोगजंतू मरतात. तसेच पाण्याला खराब वास येत असेल तर तोही नाहीसा होतो. अशी यंत्रे महाग असतात. ते घेणे शक्य नसेल तर नळाला लावायची साधी गाळणी लावा. कमीतकमी बारीक विणीच्या कापडाची पिशवी तरी नळाला बांधा.
विषमज्वर, कावीळ, हगवण व जुलाब अशा साथी पसरल्या असतील तर पिण्याचे पाणी दहा मिनिटे उकळून व थंड करून प्या.
याच कारणासाठी प्रवासातही शक्य असेल तर असेच पाणी बरोबर घेऊन जा किंवा शक्य असेल व परवडत असेल तर सीलबंद बाटलीतून मिळणारे खनिजयुक्त ( mineral) पाणी प्या.
पाणी नळाचे असो की सीलबंद बाटलीतील ते तुमच्या शरीरास आवश्यक व योग्यच आहे. त्यामध्ये शरीराला आवश्यक कॅल्शियम, पोटॅशियम व मॅग्नेशि्यम ही खनिजे अल्पप्रमाणात असतात .
तेव्हा "जल हेच जीवन" मानून भरपूर पाणी प्या!!


3 comments:

Biby Cletus said...

Cool blog, i just randomly surfed in, but it sure was worth my time, will be back

Deep Regards from the other side of the Moon

Biby Cletus

nitin said...

khupach jarrury mahiti hya blogne mala dili me khupach aabhaari aahe !!!!!!!!!!!!!!!1

veena said...

very useful info, very nice

About Me

MY GUESTBOOK