१) साधी कार्बोदके अथवा शर्करा:
Simple Carbohydrates:Sugars

अ) गट पहिला: एक अणू शर्करा: Monosaccharides
या गटामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज व गॅलॅक्टोज इत्यादी प्रकारच्या शर्करा येतात.
ग्लुकोज: ही तुमच्या रक्तातील महत्वाची साखर असून ती तुम्हाला त्वरीत उर्जा देते.
फ्रुक्टोज : ही साखर अतिशय गोड असून तॊ फळे व भाज्यांमध्ये असते.
मधामध्ये या दोन्ही शर्करा असतात.
ब) गट दुसरा: द्वीअणू शर्करा: Disaccharides
या गटात सुक्रोज, माल्टोज व लॅक्टोज इत्यादी शर्करा येतात.
सुक्रोज: ही ग्लुकोज व फ्रुक्टोज या दोन अणूंच्या संयोगाने बनते. सुक्रोज ही साखर अतिशय गोड असून ती ऊस व बीट यांपासून बनवितात. हीच सुक्रोज साखर घालूम तुम्ही रोज चहा/ कॉफी/ दूध पिता.
लॅक्टोज : ही आहे दुधातील नैसर्गिक साखर. ती ग्लुकोज व गॅलॅक्टोज या दोन अणूंच्या संयोगाने बनलेली असते.
माल्टोज : ही साखर ग्लुकोजच्या दोन अणूंच्या संयोगाने बनत असून गोड पदार्थांमध्ये स्वाद येण्यासाठी ती वापरली जाते.
साधी कार्बोदके अर्थात साखर ही पचनास अत्यंत सहज व त्वरीत उर्जा देणारी असते.
पण सावधान ! साखर ही पचनास कितीही सहज व त्वरीत शक्ती देणारी असली तरी त्यातून इतर पोषक तत्वे मिळत नाहीत. त्यामुळे थकवा आला की ऊठ सुठ ग्लुकोज पावडर खाणेही योग्य नाही. त्यामुळे साखर खायचीच ती प्रमाणात खा. साखरेचा अतिरेक टाळा.
२)संयुक्त कार्बोदके अथवा पिष्टमय तत्व:
Complex Carbohydrates:

अ)पिष्टमय तत्व: Starch
ग्लुकोजचे शेकडो अणू एकमेकांच्या टोकाला जोडले जाऊन पिष्टमय तत्व किंवा स्टार्च बनते.
वनस्पतींनी बनविलेली साखर वनस्पतींची गरज पूर्ण करूनही उरते. ही उरलेली साखर पिष्टमय तत्वांमध्ये रुपांतरीत करून भविष्यासाठी त्याची साठवण केली जाते. म्हणजेच पिष्टमय तत्व हे वनस्पतींचे साठवणीचे अन्न आहे. तेच आपल्याला धान्ये, कडधान्ये, मका, बटाते, रताळी इत्यादी मधून मिळते. वेगवेगळ्या धान्यांची पीठे, पिठांपासून बनविलेले वेगेवेगळे पदार्थ जसे भाकरी, पोळी, पाव. पिझ्झाबेस, पास्ता, नुडल्स इत्यादी तसेच भात , बटाटे, कडधान्ये, वाटाणे इत्यादींमध्ये हे पिष्टमय तत्व भरपूर प्रमाणात असते.
पिष्टमय तत्वाचे पचनानंतर साखरेत रुपांतर होते. पण हे पचन हळूहळू होते. त्यामुळे पिष्टमय तत्वापासून मिळालेली ऊर्जा जास्त वेळ पुरते. शरीराला जास्तवेळ ताकद व जोम मिळतो.
ब) तंतूमय तत्व:
Unsoluble Fiber: Cellulose
ग्लुकोजचे अनेक अणू एकमेकांना जोडले जाऊन हे सेल्युलोज अर्थात तंतू बनतात. या सेल्यलोज तंतूपासूनच बनस्पतींच्या पेशींचे आवरण बनलेले असते. हे पेशींचे आवरण असल्यामुळे अर्थातच त नविरघळणारे ( unsoluble) असते.

इतर प्राण्यांच्या शरीरात या तंतूंचे पचन होत असले तरी मानवी पचनसंस्था हे तंतू पचन करू शकत नाही. त्यामुळे त्यापासून शरीराला काही पौष्टिक तत्व मिळू शकत नाही.
असे असले तरी शरीरात पचन न होण्याच्या त्यांच्या या गुणामुळेच ते शरीराला उपयोगी पडतात. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यावर त्यातील उपयुक्त पोषक तत्वे शरीर शोषून घेते . उरलेले काही पदार्थ हे टाकावू असतात. हे टाकावू पदार्थ शरीराबाहेर जावे लागतात. या सुट्या टाकावू पदार्थांना एकत्रित बांधण्याचे काम हे तंतू करतात. तंतूमुळे एकत्र बांधले जाऊन त्यांचा गोळा तयार होतो. गोळा बनल्याने हे टाकावू पदार्थ तुमच्या आतड्यातून पुढे सरकू लागतात. त्यामुले ते मळावाटे बाहेर टाकायला मदत होते. आहारात तंतूमय तत्व नसतील तर शरीरात निर्माण होणारे टाकावू पदार्थ मळावाटे शरीराबाहेर टाकायला अडचणी निर्माण होतात. बध्दकोष्ट होते. परिणामी आतड्यांचे बरेच आजार होऊ शकतात.
म्हणूनच .या तंतूमय तत्वांची तुमच्या शरीराला अत्यंत गरज आहेच त्यामुळे रोजच्या आहारात हे न पचनारे तंतू तुम्ही खाल्लेच पाहिजेत.